शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

शिराळा शहर

शहर विषयक थोडक्यात

शिराळा नगरपंचायत सन १६ मार्च २०१६ साली स्थापना झाली. शिराळा शहर हे ऐतिहासिक वारसा असणारे शहर आहे.येथे भोईकोट किल्ला आहे. गोरक्षनाथाचे मंदिर आहे.आंबामाता मंदिर आहे.तसेच ११ मारुती पैकी एक वीर मारुतीचे मंदिर शिराळा शहरात आहे.शिराळा शहरामध्ये सालाबादप्रमाणे नागपंचमीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

शिराळा शहरातील अंबामाता मंदिर.
गोरक्षनाथ मंदिर
समर्थ रामदासस्वामी स्थापित ११ मारुती पैकी एक वीर मारुती मंदिर.
सांस्कृतिक परंपरा
श्रीनाथलीलामृत या ग्रंथात या गावाचा उल्लेख श्रीयाळपुर असा आहे.करवीरमहात्म्यया ग्रंथात श्रीयाळ असे शिराळ्याचे नाव आहे. शिराळा येथील गोपाळ कृष्ण पथावरील भवानी मंदिरातील शिलालेखात शिराळा याचा श्रीआलय असा उल्लेख आहे. श्री म्हणजे आंबामाता, आंबामातेचे वस्तिस्थान असलेले गाव ते ‘श्रीआलय’ शिराळा  या गावाचे आणि नागपंचमीचे अतुट नाते आहे. नागांची पुजा व मिरवणुक हा शिराळ्याचा पारंपारिक वारसा आहे . शिराळा येथे नागांची पुजा केव्हा सुरू झाली हा प्रश्न आहे. परंतू  या नागपुजेला किमान १००० वर्षाची परंपरा आहे . हे साधार सिध्द करता येईल. शिराळ्याच्या या नागपंचमीला साक्ष समर्थ रामदासांनी आपल्या काव्य पंक्तितून दिली आहे. कृष्णातीरी रामदास आलेनंतर ( शके १५६७-६८ इ.स.१६४५-४६ ) आसपासच्या प्रदेशात भ्रमण केले. कोल्हापुर पासून शहापुर पर्यंतच्या तीर्थक्षेञांचे वर्णन करताना एका डफगाण्यात ते म्हणतात.

जागा लक्ष्मीचे सिराळे | तेथ निघती नागकुळे ||
श्रावणमासी मुले बाळे || खेळवती ||

लक्ष्मीचे सिराळे म्हणून शिराळा हे गांव पुर्वी ओळखले जात होते.

जगप्रसिद्ध 32 शिराळा नागपंचमी नागदेवतेच्या मानाच्या पालखीची अखंड परंपरा...

गोरक्षनाथ महाराजांनी इसवी सन आठव्या शतकात शिराळ्यात वास्तव्यास असताना जीवंत नागाच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली. हि परंपरा त्याकाळचे दशग्रंथी ब्राह्मण कुटुंबीय महाजन (सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन) यांचे घरापासून सुरु झाली. आजही परंपरागत नागदेवतेची पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघते. या पालखीची तयारी आठ दिवस आधीपासून सुरू होते. शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावसेच्या दिवशी मूर्तीची लिंबू, माती आणि राख यांच्या सहाय्याने स्वच्छता करतात. त्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भास्कर महाजन मूर्ती ब्रासो वापरून स्वच्छ चकचकीत करतात आणि त्याला ठरलेल्या मनमोहक रंगांनी रंगवतात. नागपंचमीच्या दिवशी परंपरागत पालखी भोई बांधव कडून तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते. त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्रालंकारांनी केली जाते. सकाळी अकरा वाजता पालखीचे मनोभावी मंत्रोपचार ने विधिवत पूजा केली जाते. याआधी जिवंत नागाची पुजा करण्याची परंपरा होती, पण सध्या फक्त मूर्तीची पूजा केली जाते. यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन पूर्ण होते. यानंतर गुरुवार पेठ मार्गे पालखी सोमवारपेठेतील मरीमीआईच्या मंदिरात  पूजे साठी जाते.त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा होते.

 सायंकाळी पालखी कासार गल्ली मार्गे, वैजेश्वर मंदिरात जाते, तिथे तिचे पूजन होते आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी परत पांडुरंग महाजन यांचे घरी येते. शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने बारा बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई लोकांचा आहे. नागाचा मान कोतवालांचा आहे. काकड आरतीचा मान काकडे चा आहे. पालखी आणि नागाची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे. पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे.

"श्रीनाथलिलामृत" मधील उल्लेख
श्री आदिनाथ विरचीत श्री नाथलिलामृत   (संपादक रा.चि.ढेरे) ग्रंथात अध्याय १० पान नं.१२६ वर शिराळ्याच्या नागपंचमीला उल्लेख आहे. मच्छिद्रंनाथ व गोरक्षनाथ यांचे वास्तव्य मच्छिद्रंगड येथे होते. गोरक्षनाथांला सांगुन मच्छिंद्रनाथांनी पुष्करला प्रयाण केले.(पुष्कर-अजमेजजवळील तीर्थक्षेञ-विष्णुचे ठिकाण-मंदिर)नंतर गोरक्षनाथ हे श्रियाळपुरला(शिराळा)आले. गोरक्षनाथांचा निवास आजच्या नाथमंदिरात होता.ते दररोज भिक्षा मागण्यासाठी गावात येत.शुक्ल पक्षातील श्रावण मासातील तो नागपंचमीचा दिवस होता.दुपारची वेळ होती गोरक्षनाथ शिराळा येथे आले होते.दारिद्र्याने अत्यंत ग्रासलेल्या एका ब्राम्हणाच्या दारात उभा राहून गोरक्षनाथांनी ‘अलक्षनाद'(अल्लख निरंजन)केला.ब्राम्हण पत्नी त्यावेळी मातीच्या नागाची पुजा करीत होती.’पुजा करून मग भिक्षा देते’असे ब्राम्हण पत्नीने गोरक्षनाथांना सांगितले .गोरक्षनाथ म्हणाले,’मातीच्या नागांची पुजा करण्याऐवजी जिवंत नागांची पुजा का करीत नाहीस?’ मग गोरक्षनाथांनी शृंगीवादन केले क्षणातच तेथे असंख्य नाग जमा झाले अत्यंत घाबरलेल्या ब्राम्हण पत्नीला व इतरांना गोरक्षनाथ म्हणाले,
यापासून तुंम्हास भय नाही । सर्व था माझे अभय।।
पन्नग न्यावे आपुल्या गृही ।।
अर्चो निया लवलाही । अरण्यात सोडावे ।।
  गोरक्षनाथांची आज्ञा होताच तेथील ग्रामस्थांनी एकेक नाग पुजेसाठी घरी न्यावयास हातात घेतला गोरक्षनाथ पुढे म्हणतात (नागांना उद्देशुन)
तुम्ही जावे आपुल्या ठाया।प्रतिवर्षी येवुनिया।।
प्रकट व्हावे ये स्थळी । गोरक्ष आज्ञा होता सवेग ।।
गुप्त झाले तेव्हा नाग । अद्याविवरी  पाहती जग ।।
अजुन आज्ञा रक्षिती ।।
पद्मपुराण व करवीर महात्ममधील उल्लेख

   आर्यावर्तात पद्मपुराणहा अतिप्राचिन ग्रंथ मानला जातो  या ‘पद्मपुराणात‘ ‘करवीरखंड‘ नावाचा एक स्वतंञ भाग होता. कालओघात करवीरखंड हा लुप्त झाला त्याच खंडावरून करवीरमहात्म्य नावाचा मराठी अनुवादित ग्रंथ लिहला आहे.त्यामध्ये १३व्या व १४व्या अध्यायात शिराळा नागपंचमी विषयी पुढील प्रमाणे आढळतो .

   आपल्या स्वभावानुसार सर्व सर्व विष फुत्कार करू लागले तेव्हा सत्यवतीने त्याना ‘तुम्ही मुके व्हाल’ असा शाप दिला.त्या शापाचे उपकार मानुन सर्व साप पारशर मुनींच्या कडे गेले. लोकोपकारासाठी सर्वाना विषहीन बनवायचे होते.पराशर मुनींच्या आज्ञेने सर्व जमीन पोखरून  करवीर श्री महालक्ष्मीच्या मंदिरात आले.महालक्ष्मीच्या दर्शनाने सर्प प्रसन्न झाले .’गरूडाचे भय नाहीसे व्हावे व विषहीन बनावे ‘असा अभय त्यानी मागितला .नागाला (कोल्हापुर) येथे नागतीर्थ व नागविंग तयार झाले.सर्पानी नंतर पन्नालय (पन्हाळा) येथील तीर्थात अंघोळ केली ते स्थान ‘विषकुड’या नावाने प्रसिध्द आहे.महालक्ष्मीच्या वरदानाने नाग मुक्तपणे संचार करू लागले.कालांतराने त्यांना देवीचे विस्मरण झाले गरूड पुन्हा ञास देवू लागले.सर्प पुन्हा देवीस शरण गेले.देवी म्हणाली ,”करवीरच्या उत्तरेस एक शिला आहे.तेथे तुम्ही वास करा ते लोक तुमची पुजा करतील नागपंचमीला तुम्ही  बाहेर या व लोकांच्या पुजेचा स्वीकार करा.मी महिषासुराला मारले त्यावेळी माझ्या गळ्यातील वैजयंतीमाळेचा एक मणी  ज्याठिकाणी  पडला आहे तेथे वैजेश्वरांचे एक लिंग तयार झाले आहे. तेथे सात दिवस माझा मुक्काम होता ते स्थान श्रीयाळ(शिराळा) या नावाने प्रसिध्दीस येईल. तेथे गरूडाचे भय न बाळगता सुखाने रहा. करवीरमहात्म्य‘  या ग्रंथातील वरील उल्लेखाने शिराळा येथील नागपंचमीचे प्राचीनत्व सिध्द होते.